मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र

By Team Bhampak Articles Laxman Asbe Lifestyle 5 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र

उद्योजकता विजडम

१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. त्यावेळी त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फुट इतके लहान होते. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे, तरी सुध्दा त्याचे घर हे लहान आहे म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात, तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला.

२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाख पर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्स व्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशलमीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व अॅप निरुपयोगी, काही कामाची नसतात.

३) महागडे घर : आजकाल मोठे मोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा डयुप्लेक्स खरेदी करण्याचे बर्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीय यामध्ये हे प्रमाण वाढत आहे, कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर लोक कार तर घेतात. परंतु सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियासोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.

मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस व त्याचा ७०% चा मंत्र

५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवन शैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी वापरले जातात, बाकी ते कपाटातच पडून राहतात आपण घेतलेले महागडे कपडे हे ७०% निरुपयोगी असतात, ते फक्त ठराविक वेळीच वापरतो नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत.

६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात , कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दी पेक्षा दर्दी लोकांत रहा.

७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्ती जवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच त्याला उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल तर त्यापैकी आपण ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कामवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात, शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का?

८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बर्याच ठिकाणी आधुनिक लाईफ स्टाईल म्हणून फार कमी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या वापरल्या जातात त्यामुळे त्यांचा वापरही ७०% ही होत नाही.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तु वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तु खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दीमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात.
आपणही हा मंत्र उपयोगात आणा, आणि सुखी व्हा.खरेतर खुप गरज आहे, आपल्याला अशा गोष्टींची

– डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a comment